पानिपत येथे मराठ्यांचा पराभव झाला आणि तेणेकरून महाराष्ट्रावर दुःख, खेद, विषाद यांची छाया पसरली, पण ती तात्कालिनच होती. या पराभवाचे परिणाम आपणांस सर्वस्वी मारक होतील, असे त्यांस त्या काळी वाटलेले दिसत नाही . अखिल हिंदुस्थानच्या कल्याणाच्या दृष्टिने विचार करता काहींना हा युद्धशास्त्रदृष्ट्या झालेला पराभव, नैतिकदृष्ट्या मोठा विजयच वाटला असल्याचे दिसून येते.
इव्हॅन्स बेल या विचारवंत इतिहास अभ्यासकाने संशोधनकालापूर्वीच लिहिले की, पानिपतची लढाईसुद्धा मराठ्यांना अभिमानास्पद व कीर्तिस्पद अशीच घटना समजली पाहिजे ! मराठे 'सर्व हिंदी लोकांसाठीच हिंदुस्तान' या ध्येयासाठी लढले ! पण दिल्ली, अयोध्या व दख्खन येथील प्रबळ मुसलमान सत्ताधीशमात्र या वेळी कारस्थाने करीत, आपल्या चैनीत दंग होऊन एका बाजूस बसले, आणि जरी मराठ्यांचा या युद्धात पराजय झाला तरी विजयी अफगाण जे यानंतर एकदा परत गेले ते हिंदी राजकारणांत ढवळाढवळ करण्यासाठी पुन्हा कधी दिल्लीस आले नाहीत !
प्रिन्सिपल
रॉलिन्सन काशीराजाच्या बखरीच्या आपल्या प्रस्तावनेत लिहितात, ''विशिष्ट
परिस्थितीचा विचार करता इतिहासांतील एखादा पराजय विजयाइतकाच सन्मानदायक
म्हणावा लागतो, आणि मराठ्यांच्या सर्व इतिहासांत त्यांच्या फौजेने
राष्ट्रांतील सर्व उत्तम शिलेदारांसह पानिपताच्या घणघोर रणक्षेत्रांत
आपल्या देशाच्या वैऱ्यांशी लढताना जे मरण पत्करले त्याहून जास्त यशदायक मरण
इतिहासात क्वचितच नोंदले गेले असेल ! पानिपत ची लढाई हेच सांगुन जाते की
हरलात तरी हरा असं की, हरवणाऱ्याची पुन्हा लढायची हिम्मत नाही झाली पाहिजे.
आणि त्यामुळेच ती लढाई पानिपत नाहीतर पुण्यपथ ठरते.